बाहुळे - येथील शिवारात भात लागणीचे प्रात्यक्षिक करताना संतोष पाटील , भाग्यश्री फरांदे, प्रविण मुदगूल , प्रकाश राठोड , अधिकारी व शेतकरी ( छाया - संजय दळवी , केळघर )
'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद
केळघर : प्रतिनिधी - (टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे (ता. जावली ) येथे कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाहुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सुधारित चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलणी करत भाताची लावणी केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः शेतावर रोटर चालवून चिखलणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपक्रमातील 'बळीराजाशी नाळ जोडणारा' उद्देश सार्थ ठरवला.
शेतकऱ्यांशी संवाद व समस्यांचे निवारण
भात लावणीनंतर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञान, चारसूत्री भात लागवडीचे फायदे आणि कृषी योजनांवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी शिवसेना उपसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे,तहसीलदार प्रवीण मुदगुल, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड, मंडल कृषी अधिकारी (मेढा) बापूसाहेब रुपनवर, उपकृषी अधिकारी प्रसाद फडतरे , दत्तात्रय जाधव , मंडल अधिकारी संतोष भोसले , ग्राम महसूल अधिकारी संदीप ढाकणे , सहाय्यक कृषी अधिकारी सर्वश्री वैभव डोईफोडे, मिलिंद बर्गे, भानुदास चोरगे, संतोष इंगवले, विलास कदम, सचिन बेसके, विशाल डंगारे, धनंजय सापते, नितीन जांभळे, अनिल चव्हाण, रामकृष्ण डंगारे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी शेतात उतरून पारंपारिक भलरी गीत म्हणत , भात लावणीचा आणि 'एक दिवस बळीराजासाठी' या उपक्रमाचा मनापासून आनंद लुटला. या उपक्रमामुळे कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.



