मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या भेटी प्रसंगी एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओबळे, नंदू गोरे, सचिन शेलार, प्रशांत जुनघरे, समीर गोळे , सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदीप कासुर्डे , बाळासाहेब शिर्के आदि
केळघर : प्रतिनिधी -(टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - कुसुंबी गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या कविता ओबळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कुसुबी गटातील विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याची ग्वाही दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.
या भेटीदरम्यान कुसुबी गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांसंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भगवा उंचावतो” असे म्हणत स्थानिक नेतृत्वाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच “भगव्याची उंची तुम्ही वाढवली” या शब्दांत त्यांनी जनतेच्या जनादेशाचा सन्मान केल्याचे सांगण्यात आले.
या शिष्टमंडळात सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा. एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओबळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख नंदू गोरे, सचिन शेलार, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, तालुकाप्रमुख समीर गोळे तसेच सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदीप कासुर्डे आणि बाळासाहेब शिर्के उपस्थित होते.
कविताताईंनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेच्या विश्वासाला देत कुसुबी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. राज्यस्तरावरून आवश्यक निधी व प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या भेटीनंतर कुसुबी गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

