आंबेघर तर्फे मेढा - येथील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाची पाहणी करताना ज्ञानदेव रांजणे.समवेत सागर धनावडे , हरिभाऊ शेलार , निलेश कोहाळे व ग्रामस्थ ( छाया - संजय दळवी )
महाबळेश्वर विटा राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे .
ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा जनआंदोलन : सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे यांचा इशारा
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे काम ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने केल्याने महाबळेश्वर-सातारा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातात निरपराध नागरिकांचा बळी जात असून चुकीचे काम केलेल्या ठेकेदाराला या प्रकरणी जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे,अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे यांनी दिला आहे.
आंबेघर तर्फे मेढा (ता जावली ) येथील रामजीबुवा मंदिरालगत असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भेगा पडल्या असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , केळघर विकास सोसायटीचे माजी चेअरमन हरिभाऊ शेलार , सागर धनावडे , बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता निलेश कोहाळे यांनी नुकतीच आंबेघर येथे पुलाची पाहणी केली. वेळी सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी हा इशारा दिला . यावेळी ते म्हणाले, विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केले आहे. रामजीबुवा मंदिराजवळच्या पुलाची कालमर्यादा संपली ठेकेदार हा पूल केंव्हा बांधणार , रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना त्या ठेकेदाराने देखभाल -दुरुस्ती कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. केळघर बाजारपेठेत एक लेनचे , गटरचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाचे पाणी दुकाने , घरामध्ये जाऊन नुकसान होत आहे . रस्त्याला दोन्ही बाजूंना नाले काढणे आवश्यक होते,मात्र रस्त्याला नाले न काढल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घाटातील व केळघर बाजारपेठेतील अनेक ठिकाणी शेवाळ पकडून रस्त्यावर महिला , पुरुष पडून दुखापतग्रस्त झाले आहेत . रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्या आहेत.त्या साईड पट्यांची स्वछता ठेकेदाराने न केल्याने साईडपट्या गवताने झाकून गेल्या आहेत. रस्त्याला रिप्लेक्टर , दिशा दर्शक फलक नसल्याने वाहने चालवताना धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. तसेच गावा गावात जाणाऱ्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत . केळघर बाजारपेठेत तोडलेले बसस्थानक तसेच इतर गावांची बस स्थानकांची कामे केली नाहीत .गेल्या वर्षभरात या रस्त्यावर चुकीचे काम केल्याने प्राणांतिक अपघात झाल्याने यास ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी जावळी तालुक्याच्या वतीने जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा धनावडे यांनी दिला आहे.
यावेळी ज्ञानदेव रांजणे म्हणाले, आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२० साली या परिसरातील विकासासाठी जवळपास चारशे कोटीचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आला मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे व काही ठिकाणी झालेल्या चुकीच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे . सद्यपरिस्थितीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रामजीबुवा पुलाच्या दोन्ही बाजूकडे संरक्षण कठडे करणे , स्पिड ब्रेकर करणे रिप्लॅक्टर बसविणे तसेच केळघर घाटातील काळ्या कड्याच्या वरील बाजूस रस्त्याला धोकादायक झालेल्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री . रांजणे यांनी सांगितले.
अनेक इतिहासाचा साक्षीदार असलेल्या आंबेघर तर्फ मेढा येथील रामजीबुवा मंदिराजवळ हा वेण्णा नरीवरील पूल ब्रिटीशकालीन असून आर्च पद्धतीने कोरीव दगड , चुण्याच्या मिश्रणात बांधलेल्या या पुलाला १५० वर्षे झाली असून अजूनही रहदारी चालू आहे या पुलाच्या इतिहासात पहिल्यांदा जुर्ले २०२१ च्या महापूरात या पुलावर पाच फूट पाणी होते . असे ज्येष्ठ जाणकार सांगतात .