बोंडारवाडी धरण कृती समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना भारत पाटणकर, समवेत आदिनाथ ओंबळे, उषा उंबरकर, कृती समितीचे कार्यकर्ते आदी
बोंडारवाडी धरणाच्या लाभार्थ्यांचा १८ ऑगस्टला केळघर येथे मेळावा; बहुसंख्येने उपस्थित रहा - डॉ . भारत पाटणकर
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )
बोंडारवाडी धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी रविवारी (ता. १८ ऑगस्ट) केळघर येथे होणाऱ्या मेळाव्याला आपापल्या जमिनीचे सातबाराचे उतारे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आदिनाथ ओंबळे, नारायण धनावडे, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समन्वयक संतोष गोटल, नारायण सुर्वे, एकनाथ सपकाळ, राजेंद्र जाधव, जगन्नाथ जाधव, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, शिवाजी बेलोशे, उषा उंबरकर, बाजीराव धनावडे, श्रीरंग बैलकर, अशोक पाटें, बजरंग चौधरी यांसह ५४ गावांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, "बोंडारवाडी धरण होणार हे १०० टक्के खरे आहे; परंतु आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या प्रकल्पाचा नारळ फुटून त्याला गती मिळाली पाहिजे, तसेच या प्रकल्पात बाधित गावांना व
शेतकऱ्यांना प्राधान्याने योग्य मोबदला व पुनर्वसन लाभ मिळावा, यासाठी मी व कृती समिती सरकार दरबारी आधी पुनर्वसन मग धरण या मागणीसाठी आग्रह धरणार आहे." ५४ गावांतील धरणाच्या पाण्याने किती क्षेत्र भिजणार आहे. त्यानुसार गावांतील कुटुंब संख्या यांचा अभ्यास करून पाणी वापर सोसायटीची स्थापना करण्यात येऊन एकही कुटुंब पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी धरण लाभ गाव समितीने घ्यावी, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. भविष्यात निर्माण घेणारे धोके टाळण्यासाठी ५४ गावांच्या लाभ क्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, यासाठी पुढील धोरण ठरवण्यासाठी सर्वानुमते १८ ऑगस्ट रोजी केळघर येथे भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे व अन्यत्र विस्थापित शेतकऱ्यांनी आपापले सातबारा, खाते उतारे घेऊन टाळाटाळ न करता या बैठकीला स्वतः जातीने हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले.