फोटो - सातारा - मार्गदर्शन करताना अमित कदम, व्यासपीठावर कल्याणराव आखाडे, सुभाष नरळे, प्रदिप विधाते, संजय देसाई व इतर.
केळघर : वार्ताहर - सामाजिक सलोखा ठेवून सातारा जिल्ह्यात बहुजन विचारांचे संघटन केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी ओबीसी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री. आखाडे बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, प्रदेश कार्यकारिणीचे समन्वयक श्री. बाळबुध्दे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, संजय देसाई, अरविंद कदम, शशिकांत वाईकर, सादिकभाई इनामदार, मिलिंद नेवसे, साधू चिकणे, रोहित रोकडे, प्रकाश कोकरे, श्री. लोहार, संजय पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश गोळे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजाचे संघटन करण्यात येत आहे. सर्वसमावेशक जाती जमातींचे संघटन करुन जिल्हा कार्यकारिणीमध्ये त्यांनी संधी द्यावी, अशी सुचना श्री. आघाडे यांनी केली.
अमित कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद आणखी वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचे संघटन करुन पक्षबांधणी केली जाईल. पदाधिकारी निवडीमध्ये सर्व तालुक्यांना न्याय देवून गावोगावी राष्ट्रवादी पक्ष पोहोचण्यावर आमचा भर राहणार आहे. संघटनात्मक बांधणीनंतर जिल्ह्यात तालुकानिहाय मेळावे होणार असून जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी भक्कम करणार आहे. जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे यांनी आभार मानले.

